
भारत सरकारने काल मध्यरात्री यशस्वीपणे पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूर संदर्भात आज सकाळी एक विशेष पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंह आणि भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी या दोन महिला अधिकाऱ्यांनी कारवाईची माहिती दिली. त्यांनी पाकिस्तानमधील दहशतवादी कारवायांचा आणि त्या मागील अड्ड्यांचा सुस्पष्ट व ठोस पुराव्यानिशी पर्दाफाश केला.
ही कारवाई 6 ते 7 मेच्या मध्यरात्री 1:05 ते 1:30 दरम्यान पार पडली. या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानातील आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) एकूण नऊ दहशतवादी तळांवर अचूक हल्ले करण्यात आले.
कारवाईमागील पार्श्वभूमी
गेल्या आठवड्यात पहलगाम आणि गुलमर्ग येथे झालेले दहशतवादी हल्ले, ज्यात निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला, त्या पार्श्वभूमीवर भारताने कठोर पवित्रा घेतला. न्याय मिळवण्यासाठी आणि दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवण्यात आलं, असं सरकारकडून सांगण्यात आलं.
कारवाईपूर्वीची तयारी
या मिशनसाठी टार्गेटची निवड अत्यंत विचारपूर्वक आणि अचूक गुप्तचर माहितीच्या आधारावर करण्यात आली होती. हल्ल्याच्या वेळी एकाही निष्पाप नागरिकाचा बळी जाऊ नये, याची विशेष काळजी घेण्यात आली. या कारवाईत अत्याधुनिक तंत्रज्ञान, उच्च क्षमतेच्या क्षेपणास्त्रांचा वापर आणि अचूक नियोजन यांचा समावेश होता.
POK मधील लक्ष्यस्थानं (पाकव्याप्त काश्मीर):
सवाई नाला कॅम्प, मुजफ्फराबाद – लष्कर-ए-तोयबाचा मुख्य प्रशिक्षण तळ. पहलगाम व गुलमर्ग हल्ल्यातील अतिरेक्यांना इथंच प्रशिक्षण मिळालं होतं.
सयदना बिलाल कॅम्प, मुजफ्फराबाद – जैश-ए-मोहम्मदचा जंगल प्रशिक्षण केंद्र. आंतरराष्ट्रीय दहशतवादी घडवणारे मुख्य अड्डे.
कोटली कॅम्प – एलओसीपासून 30 किमी दूर. राजोरी व पुछमधील हल्ल्यांचे मास्टरमाईंड याच कॅम्पमध्ये तयार झाले होते.
बर्नाला कॅम्प, भिमभेर – एलओसीपासून अवघ्या 9 किमीवर. शस्त्र हाताळणी व जंगल युद्ध प्रशिक्षण यासाठी ओळखला जातो.
अब्बास कॅम्प, कोटली – एलओसीपासून 13 किमीवर. येथे लष्करचे ‘फिदायीन’ (आत्मघाती) दहशतवादी तयार केले जात होते. येथे सुमारे 15 अतिरेक्यांना राहण्याची व्यवस्था होती.
पाकिस्तानच्या आतील लक्ष्यस्थानं:
सर्जल कॅम्प, सियालकोट – आंतरराष्ट्रीय सीमेपासून केवळ 6 किमी अंतरावर. मार्च 2025 मध्ये झालेल्या पोलिसांवरील हल्ल्यातील अतिरेक्यांना इथे प्रशिक्षण दिलं गेलं होतं.
महनूमा जाया कॅम्प, सियालकोट – हिज्बुल मुजाहिद्दीनचं प्रमुख केंद्र. पठाणकोट हल्ल्यातील अतिरेक्यांचं मुख्य प्रशिक्षण इथे झालं होतं.
मर्कस तायबा, मुरिदके – भारतात झालेल्या अनेक मोठ्या हल्ल्यांच्या मुळाशी असलेलं ठिकाण. मुंबई हल्ल्याचे अतिरेकी अजमल कसाब आणि डेव्हिड हेडली यांना इथेच प्रशिक्षण देण्यात आलं होतं.
महिला अधिकाऱ्यांचा प्रभावी खुलासा
या पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी गुप्तचर माहिती, लक्ष्य निर्धारण, कारवाईची अंमलबजावणी आणि ऑपरेशननंतरची स्थिती यावर प्रकाश टाकला. त्यांनी प्रत्यक्ष पुरावे दाखवत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे जाळे आणि त्यामागील लष्करी यांचे हात दाखवून दिले.
भारत सरकारने स्पष्ट केले की, दहशतवाद्यांच्या सुरक्षित आश्रयस्थानी कुठलाही थांबा दिला जाणार नाही.“दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी भारत सज्ज आहे, आणि गरज पडल्यास पुन्हा अशी कारवाई करण्यात येईल,” असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला.