
आयपीएल 2025 मधील 58वा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात 8 मे रोजी धर्मशाळेच्या मैदानावर पार पडत होता. नियोजित वेळेनुसार खेळाला सुरुवात झाली. पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 10.1 षटकात त्यांनी एकाच विकेटच्या मोबदल्यात 122 धावा केल्या होत्या. मात्र, याच टप्प्यावर अचानक सामना थांबवण्यात आला आणि नंतर अधिकृतरित्या सामना रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली.
सुरक्षा कारणास्तव खेळाडू आणि स्टाफला तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले, तर प्रेक्षकांनाही व्यवस्थितरीत्या मैदानाबाहेर काढण्यात आले. हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक होता, त्यामुळे त्याच्या निकालाबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे.
सामना झाल्यास आणि निकाल लागल्यास गुणतालिकेतील चित्र कसे बदलणार?
पंजाब किंग्स विजय मिळवत असल्यास, त्यांचे 17 गुण होतील आणि ते थेट गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचतील.
दिल्ली कॅपिटल्स विजय मिळवत असल्यास, त्यांचे 15 गुण होतील. नेट रनरेटच्या आधारे ते तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर राहतील.
बीसीसीआयकडून अंतिम निर्णयाची प्रतीक्षा
सध्या बीसीसीआयने या अर्धवट सामन्यावर कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही. फ्रेंचायझी आणि बोर्डाची बैठक होऊन त्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल. या सामन्याबाबत तीन पर्याय चर्चेत आहेत:
सामना रद्द करणे – अशा वेळी दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळेल.
सामना तिथूनच पुन्हा सुरु करणे – म्हणजे पंजाबचा आतापर्यंतचा स्कोअर कायम ठेवून सामना पुढे सुरू होईल.
सामना नव्याने खेळवणे – दुसऱ्या दिवशी किंवा वेगळ्या मैदानावर सामना पूर्णपणे नव्याने खेळवण्यात येईल.
प्लेऑफसाठी जोरदार शर्यत सुरु असताना या सामन्याचा निर्णय संपूर्ण गुणतालिकेवर मोठा परिणाम करू शकतो. त्यामुळे बीसीसीआयचा निर्णय आता सर्वांच्या प्रतीक्षेचा विषय ठरला आहे.