
‘ऑपरेशन सिंदूर’ या नावाने भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या सीमेलगत केलेल्या एअर स्ट्राइकनंतर राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या कारवाईवर सविस्तर प्रतिक्रिया देत तीव्र मत मांडले आहे. त्यांनी हल्ल्याचा निषेध करताना दहशतवादाविरोधात ठोस आणि लक्ष्य केंद्रीत कारवाईची मागणी केली, पण युद्धजन्य वातावरण तयार करण्यास विरोध केला.
पहलगाम हल्ल्यावर तीव्र शब्दांत निषेध
“पहलगामला जो दहशतवादी हल्ला झाला, त्याचा मी सर्वात आधी निषेध केला होता. असे हल्ले नक्कीच असह्य आहेत. मात्र यावर उत्तर म्हणून युद्ध हाच पर्याय असू शकत नाही,” असं स्पष्ट मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.
अतिरेक्यांना थेट लक्ष्य करून कारवाई हवी
ते म्हणाले, “दहशतवाद्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. जी शिक्षा पुढच्या पिढ्यांनाही आठवणीत राहील. पण अशा घटनांमागे मूळ कारण शोधणं आणि नेमके उपाय शोधणं हे अधिक महत्त्वाचं आहे. अमेरिकेवर 9/11 स्फोट झाले तेव्हा त्यांनी थेट अतिरेक्यांवर लक्ष्य साधलं, पण युद्ध पुकारलं नाही. आपल्यालाही तोच धडा घ्यायला हवा.”
“मॉकड्रील नव्हे, कोम्बिंग ऑपरेशन करा”
राज ठाकरे यांनी मॉकड्रीलसारख्या घोषणात्मक कृतींवर टीका करत सुरक्षेच्या वास्तविक उपायांवर भर देण्याची गरज सांगितली. “हजारो पर्यटक ज्या ठिकाणी जातात, तिथे सुरक्षेची काय व्यवस्था होती? मॉकड्रीलच्या नुसत्या सायरननं काही साध्य होणार नाही. त्याऐवजी कोम्बिंग ऑपरेशन करून जे अतिरेकी अजून सापडले नाहीत, त्यांना शोधून काढा,” असा सल्ला त्यांनी दिला.
पंतप्रधानांच्या वेळापत्रकावर प्रश्नचिन्ह
या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि पंतप्रधानांच्या उपस्थितीवरही सवाल उपस्थित केला. “घटना घडली तेव्हा पंतप्रधान सौदी अरेबियात होते, त्यानंतर ते बिहारमध्ये प्रचारासाठी गेले, केरळमध्ये अदानींच्या पोर्टच्या उद्घाटनासाठी गेले आणि मुंबईत वेव्ह समीटमध्ये सहभागी झाले. जर परिस्थिती इतकी गंभीर होती, तर ही दौरे थांबवता आले असते का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
देशात अंतर्गत सुरक्षेवर भर द्या
देशात अनेक ठिकाणी सुरक्षा यंत्रणा अपुऱ्या आहेत, यावरही राज ठाकरे यांनी लक्ष वेधलं. “आज नाक्या-नाक्यावर सहज ड्रग्स मिळतोय. हा दहशतवादाच्या खतपाणी घालणाऱ्या गोष्टींपैकी एक आहे. याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
शांतता, संयम आणि धोरणात्मक कृतिशीलता हवी
राज ठाकरे यांची भूमिका स्पष्ट आहे – दहशतवादाविरुद्ध ठोस कारवाई व्हावी, पण युद्धजन्य आणि भावनात्मक वातावरण तयार करून लोकांचं लक्ष भरकटवणं योग्य नाही. “शांतपणे, धोरणात्मक निर्णय घेऊन अतिरेक्यांवर कारवाई करा. युद्धाने सामान्य माणसाचंच नुकसान होतं,” असं त्यांनी शेवटी सांगितलं.