
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अमानवीय दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने काल मध्यरात्री मोठी कारवाई करत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केली. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. या निर्णयामुळे देशात संतोषाचे वातावरण असून सर्वच स्तरांतून या कारवाईचे जोरदार समर्थन करण्यात येत आहे.
आज सकाळी भारतीय सेनेने पत्रकार परिषद घेऊन हल्ल्याची सविस्तर माहिती दिली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पहलगाममधील हल्ल्याला “क्रूर, भ्याड आणि अमानवीय” ठरवत भारताने ठोस उत्तर दिल्याचे स्पष्ट केलं. या पार्श्वभूमीवर देशवासीयांचे लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या प्रतिक्रिया कडे लागले होते. सर्वांना वाटत होते की मोदी थेट या कारवाईवर भाष्य करतील, मात्र त्यांनी आपल्या पहिल्या भाषणात देशाच्या अंतराळ प्रगतीवर लक्ष केंद्रित केलं.
जागतिक अंतराळ परिषदेत मोदींचं भाषण
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी जागतिक अंतराळ संशोधन परिषदेत बोलत होते. त्यांनी आपल्या भाषणात भारताच्या अंतराळ प्रगतीचा आढावा घेतला. त्यांच्या भाषणात थेट ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख नव्हता, परंतु त्यांचा आत्मविश्वास आणि भविष्यातील योजना या कारवाईप्रमाणेच धडाडीच्या होत्या.
“भारताने अंतराळ क्षेत्रात इतिहास घडवला आहे. चंद्रयान-1 च्या माध्यमातून चंद्रावर पाण्याचा शोध लावला. त्यानंतर चंद्रयान-2 आणि चंद्रयान-3 मोहिमाही यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या. भारताचा अंतराळ प्रवास हा कुणाशी स्पर्धा करण्यासाठी नाही, तर मानवतेच्या भल्यासाठी आहे,” असं मोदी म्हणाले.
2040 पर्यंत चंद्रावर भारतीय पाऊल – मोठी घोषणा
या भाषणात पंतप्रधान मोदींनी एक मोठा आणि ऐतिहासिक दावा केला.
“2040 पर्यंत भारतीय पाऊल चंद्रावर असेल, हे मी आत्मविश्वासाने सांगतो. आणि तो दिवस दूर नाही, जेव्हा भारताचं स्वतःचं स्पेस स्टेशन असेल,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
त्यांनी सांगितलं की भारताच्या गगनयान मोहिमेतील तयारी अंतिम टप्प्यात असून भारतीय अंतराळवीर लवकरच अंतराळात झेप घेणार आहेत. या मोहिमेमुळे भारत केवळ जागतिक महासत्ता नव्हे, तर विज्ञानसत्ता म्हणूनही सिद्ध होईल, असं ते म्हणाले.
महिला वैज्ञानिकांचं नेतृत्त्व आणि टेक्नॉलॉजिकल प्रगती
मोदींनी आपल्या भाषणात भारतीय महिला वैज्ञानिकांचं विशेष कौतुक केलं.
“आमच्या अंतराळ मोहिमांचं नेतृत्व महिला वैज्ञानिक करत आहेत. ही भारताच्या प्रगतीची खरी ओळख आहे,” असं ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “आज भारताकडे २५० हून अधिक स्पेस स्टार्टअप्स आहेत. एकाच वेळी १०० सॅटेलाईट्स लाँच करण्याचा विक्रम भारताने केला आहे. हे सगळं भारतीय जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि विकासासाठी आहे.”
मोदींचं अप्रत्यक्ष संदेश – सामर्थ्य विज्ञानातही आणि संरक्षणातही
पंतप्रधान मोदींनी जरी आपल्या भाषणात एअर स्ट्राईकवर थेट भाष्य केलं नसलं, तरी त्यांचा संपूर्ण दृष्टिकोन हा भारत आता केवळ संरक्षणातच नव्हे, तर विज्ञानातही शक्तिमान बनत आहे, हे दर्शवणारा होता. त्यांच्या भाषणातून देशाच्या आत्मनिर्भरतेचा आणि नव-भारताच्या उभारणीचा संदेश स्पष्टपणे दिसून येतो.
एकीकडे भारत दहशतवादाविरोधात ठाम भूमिका घेत आहे, तर दुसरीकडे विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भव्य झेप घेत आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे भारताच्या संरक्षण नीतीची ताकद दिसली आणि मोदींच्या भाषणातून भारताच्या अंतराळ स्वप्नांची झलकही मिळाली.