
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अमानवी दहशतवादी हल्ल्यानंतर अवघ्या १५ दिवसांतच भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय लष्कराने ७ मेच्या मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर लक्ष्यभेदी हल्ले केले. या कारवाईत सुमारे १०० दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.
भारतीय लष्कराच्या अधिकृत निवेदनानुसार, ही कारवाई केवळ दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर केंद्रित होती. पाकिस्तानच्या लष्करी पायाभूत सुविधांना कोणतीही हानी पोहोचवलेली नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पहलगाम हल्ल्यात मृत्यू पावलेल्या २६ नागरिकांचा प्रतिशोध घेण्यात आल्याचे मानले जात आहे.
पाकिस्तानात घबराट आणि अनिश्चितता
भारतीय हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये आणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. इस्लामाबाद, कराची, लाहोर, फैसलाबाद, मुल्तान, स्कार्दू आणि पेशावर येथील विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, काही ठिकाणी विमान वाहतूक पूर्णतः थांबवण्यात आली आहे. परिणामी, प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी पाकिस्तानमध्ये जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत.
पाकिस्तानातील शाळा बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मरयम नवाज यांनी X (पूर्वीचा ट्विटर) वरून माहिती दिली की पंजाब प्रांतातील तसेच इस्लामाबादमधील सर्व शाळा पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.
पंतप्रधान शहबाज शरीफ यांची तातडीची बैठक
भारतीय कारवाईनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आज सकाळी राष्ट्रीय सुरक्षा समितीची आपत्कालीन बैठक बोलावली. यामध्ये देशातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला जात असून, पुढील धोरणात्मक निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. देशात तणावाचे वातावरण असून सरकार आणि लष्कर दोन्ही अत्यंत सतर्क आहेत.
दहशतवादी केंद्रांवर अचूक लक्ष्य
मुजफ्फराबाद भागात दहशतवाद्यांचे बस्तान उद्ध्वस्त करण्यात आले आहे. येथे दहशतवाद्यांनी वापरत असलेली एक मशीद पूर्णतः नष्ट झाली आहे. या मशिदीत दहशतवादी बैठका आणि नियोजन केले जात होते. भारतीय हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर (एलओसी) सतत गोळीबार सुरू असून, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणा सज्ज आहेत.
पाकिस्तानात असुरक्षिततेची भावना वाढली
पाकिस्तानमध्ये सध्या भीती, संभ्रम आणि अस्थिरतेचे वातावरण पसरले आहे. सामान्य नागरिकांत अनिश्चितता वाढली आहे. रस्त्यांवर शुकशुकाट, रुग्णालयांमध्ये गर्दी, आणि सीमावर्ती भागात वाढलेली लष्करी हालचाल हे सगळेच चित्र अत्यंत तणावपूर्ण आहे.