
पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. भारताने पाकिस्तानकडून किंवा पाकिस्तानमार्गे येणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयातीवर तत्काळ बंदी घातली असून, या निर्णयामुळे पाकिस्तानच्या डबघाईस आलेल्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसणार आहे.
परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) 2 मे रोजी अधिसूचना काढून ही आयातबंदी जाहीर केली. भारताच्या परराष्ट्र व्यापार धोरण 2023 मध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या परिच्छेद 2.20(अ) अंतर्गत ही बंदी लागू करण्यात आली आहे. यानुसार, पाकिस्तानमधून कोणत्याही प्रकारच्या वस्तूंची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयात किंवा वाहतूक पुढील आदेशापर्यंत थांबवण्यात आली आहे. कोणत्याही अपवादासाठी केंद्र सरकारची पूर्व परवानगी आवश्यक राहणार आहे.
दहशतवादी हल्ल्याची पार्श्वभूमी
22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यामध्ये सहभागी असलेला हाशिम मुसा हा पाकिस्तान लष्कराच्या विशेष दलाचा माजी पॅरा-कमांडो असल्याचे तपासात उघड झाले आहे. भारताने या हल्ल्यासाठी पाकिस्तानला थेट जबाबदार धरले असून, कारवाईसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत.
पाकिस्तानच्या निर्यातीला जबर फटका
भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानच्या निर्यात क्षेत्राला गंभीर फटका बसणार आहे. सिमेंट, कापड, कृषी उत्पादने यांसारख्या प्रमुख वस्तूंच्या व्यापारावर याचा परिणाम होणार आहे. औपचारिक व्यापार आधीच मर्यादित असतानाच, अनौपचारिक व्यापार मार्गही यामुळे विस्कळीत होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पाकिस्तानवरचा आर्थिक दबाव आणखी वाढेल.
पाकिस्तानच्या विरोधात भारताचे अन्य पावले
याआधीही भारताने पाकिस्तानविरोधात अनेक निर्णायक टप्पे उचलले आहेत. त्यामध्ये राजनैतिक संबंध कमी करणे, सिंधू पाणी करार निलंबित करणे, पाकिस्तानकडून येणाऱ्या विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे यांचा समावेश आहे. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने सिमला करार रद्द करण्याचा इशारा दिला असून, वाघा सीमा बंद केली आहे. तसेच, सिंधू करारामध्ये भारताकडून होणाऱ्या कोणत्याही हस्तक्षेपाला युद्धाची भूमिका मानण्याचा इशाराही दिला आहे.
भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला असतानाच, भारताच्या आयातबंदीच्या निर्णयाने पाकिस्तानवरचा दबाव आणखी वाढणार आहे. पुढील काही दिवस हे संबंध कोणत्या वळणावर जातात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.