
‘किंग ऑफ रोमान्स’ आणि ‘बादशहा’ अशी ओळख असलेल्या शाहरुख खानच्या घराची, म्हणजेच ‘मन्नत’ची, पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. वांद्रे येथील बॅण्डस्टँडवर असलेला हा आलिशान बंगला शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक तीर्थस्थळच बनला आहे. त्याच्या वाढदिवशी लाखो चाहते येथे जमून त्याला शुभेच्छा देतात.
मात्र, आता शाहरुख खान काही काळासाठी ‘मन्नत’ सोडणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच ‘मन्नत’मध्ये नुतनीकरणाचे मोठे काम सुरू होणार आहे. या कामासाठी शाहरुखला कोर्टाकडून अधिकृत परवानगी मिळाली असून, हे काम यावर्षी मे महिन्याच्या आधी सुरू होणार आहे. या नुतनीकरणाच्या अंतर्गत बंगल्याचा काही भाग विस्तारीत केला जाणार आहे. या नव्या विस्तारामुळे ‘मन्नत’ अधिक भव्यदिव्य आणि आलिशान दिसणार आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात गौरी खानने महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (MCZMA) कडून ‘मन्नत’ला दोन अतिरिक्त मजले जोडण्याची परवानगी मागितली होती. या विस्तारामुळे बंगल्याचे बांधकाम क्षेत्र ६१६.०२ चौरस मीटरने वाढणार आहे. ‘मन्नत’ हा ग्रेड ३ ऐतिहासिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असल्याने कोणताही संरचनात्मक बदल करण्यासाठी अधिकृत परवानगी आवश्यक असते. आता ही परवानगी मिळाल्याने मोठ्या प्रमाणावर नुतनीकरणाचे काम सुरू होणार आहे.
या नुतनीकरणाच्या कामासाठी जवळपास २५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बंगल्याच्या काही जुन्या भागांचे देखील पुनर्बांधणीचे काम करण्यात येणार आहे. यामुळे काही भाग अधिक मजबूत आणि आधुनिक केला जाणार आहे.
कामाच्या कालावधीत बंगल्यात फक्त कामगार उपस्थित असतील, त्यामुळे शाहरुख खान आणि त्याचे कुटुंब काही काळासाठी भाड्याच्या घरात राहणार आहे. शाहरुख आणि गौरी खान यांनी आधीच काही पर्यायांवर विचार केला असून लवकरच नव्या घरात स्थलांतर होणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतरच ते पुन्हा आपल्या आवडत्या ‘मन्नत’मध्ये परत येतील.
शाहरुख खानचे चाहते मात्र या नुतनीकरणाच्या बातमीने उत्सुक झाले आहेत. भविष्यात अधिक भव्य आणि सुधारित ‘मन्नत’ पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. हे नुतनीकरण पूर्ण झाल्यानंतर हा बंगला अधिकच देखणा आणि आकर्षक होणार असल्याचे बोलले जात आहे.