
22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 निष्पाप नागरिकांचा बळी गेला. या भ्याड घटनेने संपूर्ण देश संतप्त झाला असून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या हल्ल्याचा निषेध करत भावना व्यक्त केल्या, मात्र नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असलेले अमिताभ बच्चन मात्र या घटनेनंतर पूर्णपणे मौनात गेले आहेत.
फक्त ‘नंबर’ असलेली पोस्ट…
22 एप्रिलच्या रात्री बिग बींनी शेवटचं संज्ञाशब्द असलेलं ट्विट केलं – “T 5355 शांत X गुणसूत्र… मेंदू ठरवते.” त्याच दिवशी दुपारी पहलगाममध्ये हल्ला झाला. त्यानंतर त्यांनी दररोज ट्विटर (X) वर पोस्ट केल्या, पण त्या सर्व पोस्टमध्ये फक्त ‘T’ आणि पोस्ट नंबर एवढंच लिहिलं आहे – कोणताही शब्द, वाक्य किंवा भावना व्यक्त केलेली नाही.
मौनात दडलेलं दुःख?
सुपरस्टार अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर आपल्या विचारशील आणि संवेदनशील पोस्टसाठी ओळखले जातात. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या चाहत्यांची तब्येत कशी आहे याची विचारपूसही केली होती. मात्र या अमानवी हल्ल्यानंतर त्यांनी जे मौन बाळगलं आहे, ते त्यांच्या मनातील व्यथेला, दु:खाला आणि अस्वस्थतेला अधोरेखित करतंय, असं अनेकांनी म्हटलं आहे.
देश हादरला, बिग बी शांत…
23 एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंत त्यांनी नऊ वेळा X वर पोस्ट केल्या, पण एकही शब्द न लिहिता. हे मौन त्यांचं वैयक्तिक शोक आणि हतबलतेचं प्रतीक आहे का, यावर सध्या चर्चांना उधाण आलं आहे.