
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याला मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह इतर सहा जणांनाही अटक झाली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. या हत्याकांडाचे काही फोटो समोर आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली. यामुळे आरोपींना कठोर शिक्षा आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती.
या पार्श्वभूमीवर, धनंजय मुंडे यांनी आज (४ मार्च) मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “धनंजय मुंडे यांनी राजीनामा सादर केला असून तो मी स्वीकारला आहे. पुढील कार्यवाहीसाठी तो राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे.”
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले.
या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच,…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 4, 2025
धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देत एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली. त्यांनी लिहिले, “माझी प्रकृती मागील काही दिवसांपासून ठीक नसल्याने डॉक्टरांनी उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे.”
या घडामोडींवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली. त्यांनी संक्षेपात सांगितले, “धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला आहे.”