
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट पुरावे भारत सरकारकडे आल्याने देशात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. केंद्र सरकारने तात्काळ भारतीय सैन्याला सर्वाधिकार दिले असून, त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. याचे तीव्र पडसाद दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर दिसून येत आहेत.
कराची शेअर बाजारात हाहाकार
भारताच्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानमधील गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली आहे. याचा थेट परिणाम कराची स्टॉक एक्सचेंज (KSE) वर झाला आहे. बाजार उघडताच केवळ दोन तासांत KSE-100 निर्देशांकात तब्बल ३,६७९.२५ अंकांची घसरण झाली. ही घसरण बाजाराच्या इतिहासातील एक मोठा घसरणीचा प्रसंग मानली जात आहे.
दुपारी १२ च्या सुमारास KSE-100 निर्देशांक १११,१९२.९३ अंकांवर पोहोचला. घसरण काहीशी थांबल्यानंतर तो ११२,१९७.०३ अंकांवर स्थिरावला. मात्र, तरीही संपूर्ण व्यवहार काळात विक्रीचा जोर कायम राहिल्याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले.
४६ हजार कोटी पाकिस्तानी रुपयांचे नुकसान
मंगळवारी म्हणजेच एक दिवस आधी KSE चा एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) ५१.२५ अब्ज डॉलर इतका होता. बुधवारी केवळ दोन तासांच्या आत हे बाजार भांडवल ४९.६१ अब्ज डॉलरवर आले. म्हणजेच अवघ्या १२० मिनिटांतच KSE चा मार्केट कॅप सुमारे १.६४ अब्ज डॉलरने म्हणजेच ४६ हजार कोटी पाकिस्तानी रुपयांनी घटला.
ही घसरण केवळ आकड्यांपुरती मर्यादित नाही, तर तीन लाखांहून अधिक गुंतवणूकदारांचे या काळात थेट आर्थिक नुकसान झाले आहे. गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानच्या शेअर बाजारात स्थैर्य होते. मात्र २२ एप्रिलनंतर सुरू झालेल्या घसरणीत KSE-100 निर्देशांकाने एकूण ७,२३७.४२ अंकांची घसरण नोंदवली असून, यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात अस्थिरतेची भावना निर्माण झाली आहे.
पाकिस्तानात आर्थिक अनिश्चिततेचे सावट
युद्धजन्य भीतीमुळे पाकिस्तानमध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात शेअर्स विक्रीला सुरुवात केली आहे. गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास ढासळला असून, अनेक विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनीही आपली पोझिशन्स काढून घेण्यास सुरुवात केली आहे. या सर्व घडामोडींमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर आणखी संकट गडद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारताच्या बाजारात स्थैर्य, किरकोळ तेजी
दुसरीकडे, भारतात देखील युद्धजन्य वातावरणामुळे शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली. मात्र, गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास टिकून असल्याने शेवटी बाजाराने स्वतःला सावरले. बीएसई सेन्सेक्स मध्ये ९५.३३ अंकांची वाढ नोंदवली गेली आणि तो ८०,३८७.९२ अंकांवर स्थिरावला. व्यवहारादरम्यान सेन्सेक्सने ८०,४७८.७३ अंकांचा उच्चांक तर ८०,०५५.८७ अंकांची नीचांकी पातळी पाहिली.त्याचप्रमाणे, एनएसई निफ्टी मध्ये १८.१५ अंकांची वाढ झाली आणि तो २४,३५४.१० अंकांवर व्यवहार करत होता. व्यवहाराच्या सत्रात निफ्टीने २४,३९५.२० अंकांची टप्पा गाठला होता.
पुढील दिशा काय?
सध्या दोन्ही देशांच्या सीमेवर तणावाचं वातावरण असून, त्याचे परिणाम केवळ राजकीय किंवा लष्करी पातळीवरच नव्हे, तर आर्थिक क्षेत्रातही प्रकर्षाने दिसून येत आहेत. पाकिस्तानच्या बाजारातील ही घसरण भविष्यातील आर्थिक संकटांची नांदी ठरू शकते, तर भारतासाठी देखील सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.