
बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा गुन्हेगारीचा विदारक चेहरा समोर आला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील सेनगाव येथे एका महिला वकिलावर गावातील सरपंच आणि त्याच्या समर्थकांनी अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद विकोपाला गेला आणि या महिलेवर काठ्या व जेसीबीच्या पाईपने बेदम हल्ला करण्यात आला. तिच्या शरीरावर गंभीर जखमा असून, अंग काळंनिळं पडल्याने ही घटना अधिक गंभीर बनली आहे.
काय घडलं नेमकं?
पीडित महिला वकिलाने गावातील मंदिरावर लावण्यात आलेल्या लाऊड स्पीकरच्या आवाजामुळे त्रास होत असल्याचं सांगत तो बंद करण्याची विनंती सरपंच संतोष देशमुख यांच्याकडे केली होती. तसेच घरासमोरील गिरणीचा आवाजही त्रासदायक ठरत असल्याने त्यांनी तो विषयही मांडला. मात्र सरपंचाने सुरुवातीला दुर्लक्ष केलं, आणि नंतर तक्रार कर म्हणत तिला झटकून टाकलं.
त्यानंतर वकिल महिलेने पोलिसांकडे ध्वनीप्रदूषणाविरोधात तक्रार दाखल केली. यामुळे संतप्त झालेल्या सरपंचाने गावातील इतर 10 पुरुषांसोबत मिळून तिच्या घरी धाव घेतली. यावेळी तिच्या आई-वडिलांना माफी मागायला लावण्यात आली. पण त्यानंतर आरोपींनी थांबणं गरजेचं समजलं नाही.
शेतात नेत केला अमानुष हल्ला
त्यानंतर पीडित महिलेला जबरदस्तीने शेतात नेण्यात आलं आणि तिथे रिंगण करून तिच्यावर काठ्या आणि जेसीबी पाईपने अमानुष मारहाण करण्यात आली. या मारहाणीत ती बेशुद्ध झाली. तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, सद्यस्थितीत तिला चालणे आणि बोलणे सुद्धा कठीण झालं आहे.
गावकऱ्यांचा संताप
या घटनेमुळे संपूर्ण गावात आणि परिसरात संतापाची लाट उसळली आहे. महिलेला वकिल असतानाही असा अमानवी प्रकार सहन करावा लागला, हे धक्कादायक असल्याचं नागरिकांनी सांगितलं. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
पोलिसांचा तपास सुरू
या प्रकरणी संबंधित सरपंच संतोष देशमुख आणि इतर १० आरोपींविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून तपास सुरू असून, पीडितेला न्याय मिळावा यासाठी प्रशासनावरही दबाव वाढतो आहे.