
वाराणसी, उत्तर प्रदेश – उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यात घडलेली एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय तरुणीवर तब्बल सात दिवसांत, विविध ठिकाणी नेऊन २३ जणांकडून सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सहा आरोपींना अटक केली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
घटनाक्रम : विश्वासघात, फसवणूक आणि अत्याचार
पीडित मुलगी २९ मार्च रोजी तिच्या ओळखीच्या काही व्यक्तींना भेटण्यासाठी घराबाहेर पडली होती. तिच्या कुटुंबीयांना ती आपल्या मैत्रिणीकडे गेली असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, ती घरी परतलीच नाही. अखेर ४ एप्रिल रोजी मुलीच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली.
तपासात समोर आलेल्या माहितीवरून, २९ मार्च रोजी तिला एका कॅफेमध्ये नेण्यात आले, जिथे पहिल्यांदा तिच्यावर अत्याचार झाला. त्यानंतर ३० मार्चला इतर दोन आरोपींनी तिला रस्त्यात पकडून अन्य ठिकाणी नेले आणि पुन्हा अत्याचार केला. यानंतरच्या काही दिवसांत वेगवेगळ्या हॉटेल्स, हुक्का बार आणि गोडाऊनसारख्या ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आले. काही ठिकाणी तिला नशा देण्यात आली, काही ठिकाणी धमकावण्यात आले, तर काही वेळा खोट्या आमिषांना बळी पडून तिने त्या आरोपींचा विश्वास घेतला आणि तिथेच तिचा विश्वासघात झाला.
या संपूर्ण कालावधीत पीडितेने अनेक वेळा सुटण्याचा प्रयत्न केला. एका प्रसंगी ती सिग्रा भागातील मॉलबाहेर बसलेली आढळली. तेव्हा एका व्यक्तीने तिला खायला देण्याचे आमिष दाखवून पुन्हा तिला नशा दिली आणि अस्सी घाटात नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
शेवटी मिळाली कुटुंबाची साथ
या अत्याचारातून कशीबशी सुटका करून घेऊन ती एका मित्राच्या घरी पोहोचली, मात्र तिथेही तिच्या मित्राने तिचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. अखेर ती घरी परतली आणि तिने आपल्या कुटुंबियांना संपूर्ण प्रकार सांगितला. यानंतर तिच्या आईने पोलिसांत सविस्तर तक्रार दाखल केली.
कायदेशीर कारवाई
पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. त्यात सामूहिक बलात्कार (कलम ७०(१)), विनयभंग (कलम ७४), नशा देणे (कलम १२३), हालचालीत अडथळा आणणे (कलम १२६(२)), चुकीने बंदिस्त करणे (कलम १२७(२)), आणि गुन्हेगारी धमकी (कलम ३५१(२)) यांचा समावेश आहे.
अतिरिक्त पोलिस आयुक्त विदुश सक्सेना यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि उर्वरित आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, तिच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीकडे विशेष लक्ष दिलं जात आहे.
समाजाला सवाल करणारी घटना
या घटनेने संपूर्ण समाजाला हादरवून टाकलं आहे. केवळ कायद्यानं नव्हे, तर प्रत्येक नागरिकानं अशा प्रकारांबाबत जागरूक राहून एकमेकांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घेतला पाहिजे. मुलींना सुरक्षितता देणं ही फक्त प्रशासनाची जबाबदारी नाही, ती संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.