प्रतिनिधी रत्नदीप शेजावळे जिंतूर
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होईल. जिंतूर सेलू मतदारसंघाच्या इतिहासात अत्यंत चुरशीची आणि उत्कंठा वाढविणारी ही तिरंगी लढत संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेत आहे. एरवी भांबळे-बोर्डीकर यांच्यात होणाऱ्या दुरंगी लढतीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश नागरे यांनी मतदारांना तिसरा पर्याय म्हणून निवडणूक लढवली आहे. भांबळे बोर्डीकरांच्या लढतीत नागरे किती इफेक्टिव ठरतील हे निकालानंतरच स्पष्ट होईल. मागील लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत परभणी लोकसभेची कॉपी-पेस्ट होईल असे चित्र होते मात्र मेघनादीदी बोर्डीकर आणि विजय भांबळे सारख्या मातब्बर उमेदवाराच्या ठरावीक मतांच गणित सुरेश नागरे कीती प्रमाणात बिघडवू शकले हे उद्या समोर येईल. राज्यातील अनेक मिडिया संस्थांच्या निकाल सर्व्हेनी राज्यात महायुती सरकारला झुकत माप दिलं आहे, परंतु जिंतूर सेलू मतदारसंघाच्या बाबतीत जिंतूर सेलू तालुक्यातील स्थानीक गावपातळीवरून विविध माहितीद्वारे मिळालेला “एक्झिट पोल” त्याचे थोडक्यात विश्लेषण पुढीलप्रमाणे करता येईल.
🟣सुरेश नागरे
तीन महिन्यांपासून “आमचं ठरलं” म्हणून काँग्रेसकडून AB फॉर्म मिळेल अशी अपेक्षा होती मात्र ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीची साथ मिळाली. नामनिर्देशन पत्राच्या शक्ती प्रदर्शनात नागरेंनी मतांची ताकत दाखवली. दरम्यान प्रचार दौरे गावभेटी आणि शेवटी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आणि वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांच्या सभेची जनता नागरे यांना आशादायी करणारी ठरली आहे. LB बुधवंत आणि संजय साडेगावकरांचा आधार मताच्या आकड्यात वाढ करणारा आहे. सुरुवाती पासून सोबत असलेले नानासाहेब राऊत, अविनाश काळे, प्रसाद बुधवंत यांच्या व्यतिरिक्त मतदार संघात ताकत असलेल्या बंजारा धनगर बौध्द मुस्लिम आदिवासी मायक्रो ओबीसी यासर्व वंचित घटकातील मत फिरविणारा प्रत्येक समाजाच्या मोठ्या चेहऱ्याची नागरेंकडे उणीव राहिली आहे. त्यामुळे ठरावीक मतदार असलेला बौध्द आणि वंजारी समाज सोडता संख्याबळ असलेले मराठा मुस्लिम धनगर बंजारा मतदार फोडण्यात वंचित अपयशी ठरली आहे. याऊलट भाजपने वंजारी माळी बंजारा धनगर समाजाची बरीचशी मत त्यांच्या बाजूने ओढली आहेत आणि हिच फाटाफूट नागरेंना अडचणीत आणू शकते. जबाबदारी दिलेल्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते आणि समर्थक यांच्याकडून जबाबदारी पेलताना शेवटच्या टप्प्यात मतदारांना नाराज केल्याचा फटका नागरेंना भोवणारा आहे. थोडक्यात त्यांनी प्रचार सभेत घातलेली भावनीक साद आणि लावलेली ताकत सत्कारणी लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु ग्रास रुटला झेंडा घेऊन काम करणारा कार्यकर्ता आणि त्याचे नेतृत्व करणारा नेता यांच्यात समन्वय नसल्याने त्याचा फायदा त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना नक्कीच झाला आहे. एकंदर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर लावलेला ओबीसी फॅक्टर फॉर्मुला म्हणावा त्या प्रमाणात चाललेला नाही. जिंतूर शहरातील बाजी पलटवणारा मुस्लिम समाज नागरेंकडे आकर्षित झाला होता, तो शेवटपर्यंत सांभाळण्यात नागरे अपयशी ठरले आहेत. बोर्डीकर भांबळेंच्या तुलनेत सेलू तालुक्यात नागरेंची बाजु रेटणारा खंबीर नेता दिसला नाही. बौद्ध समाजातील वंचित समर्थक वगळता बूथ सांभाळणारे कट्टर समर्थक कार्यकर्ते दिसले नाहीत. त्यामुळे पाऊण लाखाच्या आत नागरेना समाधानी रहावं लागेल. असे चित्र दिसत आहे. असे असले तरी सुरेश नागरे यांच्या लढतीने मतदारसंघात भाजपाला मोठे नुकसान होईल. हार जीत हा राजकारणाचा भाग आहे. बाकी काहीही असले तरी सुरेश नागरे यांच्या सोबत त्यांच्या पत्नी अमृता नागरे यांची साथ मतदार संघातील नागरिकांच्या मनात घर करणारी आहे. कोणताही राजकीय अनुभव नसतांना, मतदारांच्या भेटीगाठी, आश्वासन, प्रचार दौरे, गाव बैठका, प्रचारात आघाडी घेणं आणि राष्ट्रीय नेत्यांच्या समोर, भावनिकता सांभाळून तारतम्य बाळगून केलेले भाषण आणि त्यांनी घेतलेल्या मेहनतीला तोड नाही. त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.
एकंदरीत सुरेश नागरे पाऊण लाख मतांपर्यंत पोहचतील असे चित्र आहे.
🟣मेघनादीदी बोर्डीकर
तिरंगी लढतीच्या शर्यतीत मतदार संघात यावेळी भाजप तीन नंबरवर राहील अशी चर्चा सुरू होती, दिर्घ अनुभव आणि विकासकामांचा मुद्दा घेऊन प्रचारात मेघनादीदी आघाडीवर राहिल्या. त्यानंतर गृहमंत्री अमित शहांच्या सभेनंतर मेघनादीदींनी पकडलेली ग्रीप मजबुत राहिली. प्रचारात घेतलेल्या आघाडीने विरोधकांची झोप उडाली. सेलुतील व्यापारी वर्ग आणि स्थानिक सेलू शहरातील मतदार मजबूत केला. अमित शहांच्या सभेनंतर हिंदू मतदार मोठ्या संख्येने एकवटला. सोरटी सोमनाथ मंदिर, वक्फ बोर्ड कायदा, कलम 370 अशा मुद्द्यांना हात घातल्यामुळे, बोर्डीकर समर्थक असणारा मुस्लिम आपसूकच दुखावला परंतु कणखर असणारा हिंदुत्ववादी मतदार पक्का बांधण्यात यश आले. तेंव्हा पासून पकडलेली ग्रिप व्यवस्थित सुरू होती परंतु मा.आ. रामप्रसाद बोर्डीकर आणि गंगाधर अंकल या दोघांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपचा फटका मोठ्या प्रमाणात नुकसान करणारा ठरू शकतो. माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या पाठिंब्याने शहरातील मतांच्या आकडेवारीत भर पडली आहे. मराठा मतदार आणि पूर्वपार मतदार असणारा मायक्रो ओबीसी, माळी,बंजारा, आणि धनगर अशी सांगड घातली तर हे गणित लाखाचा आकडा गाठू शकेल. पंकजाताईंच्या सभेचा इफेक्ट अपेक्षेेप्रमाणे दिसत नाही. वंजारी समाज मतांचा आकडा वाढविण्यात बोर्डीकर स्टॅर्टजीच उपयोगी पडली आहे. महायुतीच्या ठरल्या गणिताप्रमाणे मतांचा आकडा वाढविण्यात “लाडक्या बहिणी“ची थोडीफार मदत नक्कीच झालेली आहे.
एकंदर सर्व परिस्थिती मेघनादीदींना एक लाख मतांचा आकडा गाठण्यात मदत करणारी आहे.
🟣विजय भांबळे
महाविकास आघाडीचे उमेदवार विजय भांबळे यांनी केलेले शक्ती प्रदर्शन सर्वात प्रभावी ठरले आहे. प्रचार काळाची पावलं ओळखत विजय भांबळेनी प्रत्येक प्रचार सभेत मतदारांना वेळोवेळी घातलेली भावनीक साद प्रभावी ठरत गेली शिवाय माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी फक्त प्रेम आहे. हे शब्द मतदारांनी हेरले आणि त्याबदल्यात त्यांना देखील प्रेमच मिळेल अशी परिस्थिती मतदारांत निर्माण केली.समोर तगडे आव्हान असणाऱ्या प्रतिस्पर्धी दोन उमेदवाराना विजय भांबळे यांनी मोठ्या चतुराईने तोंड दिले आहे. सेलुमधून माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, जिंतूर मधून कृष्णकांत देशमुख, ॲड. विनोद राठोड राजाभाऊ घुगे खंडेराव आघाव यांसह ईतर महत्वाचे चेहरे त्यांच्या सोबत आल्याने जमेची बाजू ठरली आहे. मराठा आरक्षण, मराठा-ओबीसी लढत, यासर्व गोष्टी लक्षात घेता. बहुतांशी मराठा मतदार यावेळी विजय भांबळे यांच्या बाजूने गेल्याचे चित्र आहेत. अमित शहा यांच्या जिंतूर प्रचार सभेनंतर नागरे आणि भांबळे यांच्यात विभागलेला मुस्लीम मतदार भक्कम आधार शोधत नागरेंची साथ सोडून भांबळेंच्या बाजुने गेल्याचे दिसत आहे. भांबळे आणि बोर्डीकरांच्या पारंपरिक लढतीत मायक्रो ओबीसी समूहातील हिंदुत्ववादी मतदार यावेळी भांबळेंची साथ सोडून गेल्याचे चित्र आहे. जिंतूर शहरावर पकड ठेवण्यात बाळासाहेब भांबळे यशस्वी ठरल्याचे दिसत आहे. त्यामुळे संख्याबळात मोठे असणारे मराठा मुस्लिम मतदारांचे भक्कम समर्थन विजय भांबळे यांना विजयाकडे नेणारे ठरेल. मागच्या वेळी विजय भांबळे यांना वंचितमुळे हार पत्करावी लागली होती, यावेळी मात्र वंचीत त्यांना फायदेशीर ठरली आहे.
एकंदरीत विजय भांबळे एक लाखाच्या वर मत घेतील असे चित्र आहे.
—————————————————
जिंतूर सेलू मतदारसंघाच्या निवडणूक इतिहासात सर्वात जास्त मतांचा आकडा यंदा प्रथमच गाठला आहे. यापूर्वी कधी नाही तो यावेळी लक्ष्मी अस्त्रांचा प्रचंड प्रमाणावर वापर करण्यात आला. स्थलांतरित मतदार यावेळी विजयाच्या गणितात मुख्य असतील. मराठा समाजाच्या तुलनेत वंचित आणि भाजपाच्या गोटात ओबीसींची फाटाफूट अधिक झाल्याचे दिसत आहे. मत संख्याबळ अधिक असणारा मतप्रवाह फुटला पण त्यांची संख्या विजयाचा कल देणारी नाही, हे ही विशेष आहे. मराठा v/s ओबीसी लढत म्हणावी तशी जाणवली नाही. लाडक्या बहिणीचे गणित अपेक्षे प्रमाणे चालेल की नाही, यात स्पष्टता दिसत नाही. सेलू तालुक्यातील मतदार ज्या बाजूने अधिक ओढल्या गेले यावर विजयाचे गणित असणार आहे. काहीही असले तरी या लढतीत लक्ष्मी अस्त्र मोठ्या प्रमाणात वापरल्या गेले. पण घरी आलेल्या लक्ष्मीचा टिळा लावणारे आपल्या घरातील श्रद्धा असलेल्या प्रत्येक उमेदवाराला फोटोवर हात ठेऊन सर्वांनाच वचन देत होते. म्हणून विजयाची खात्री शेवट पर्यंत स्पष्टपणे देणे योग्य नाही. ग्रामीण भागातील मतदारांच्या कौलाचा हा फक्त प्राथमिक अंदाज आहे. बाकी प्रतिक्षा काही तासांची आहे.
राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघ व नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीनंतर निवडणूक आयोग व स्थानिक प्रशासनाकडून २३ नोव्हेंबरला होणाऱ्या मतमोजणीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. #विधानसभानिवडणूक२०२४ #MaharahstraElection2024 #मतमोजणी @CEO_Maharashtra pic.twitter.com/TEIk61OtLL
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) November 22, 2024