
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच प्रार्थनास्थळांवरील लाऊडस्पीकरसाठी ठरवून दिलेल्या आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यांनी केंद्र सरकार आणि न्यायालयाच्या आदेशांचे दाखले देत नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले.
यावर प्रतिक्रिया देताना माजी मंत्री आणि शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी आरोप केला की, कोळीवाड्यातील उत्सवांवर निर्बंध लादून सणांवर विरजण घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर त्यांनी असाही प्रश्न उपस्थित केला – “महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?”
सरकार सणांवर बंधनं का घालते?
आज एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत आदित्य ठाकरे म्हणाले, “आधीच गणेश मंडळांवर विविध नियम लादून आणि विसर्जनाचा प्रश्न प्रलंबित ठेवून छळलं जातंय. आता कोळीबांधवांसाठी आणि संपूर्ण हिंदू समाजासाठी महत्त्वाच्या असलेल्या होळी सणाच्या वेळी ‘माईक आणि लाऊडस्पीकरचे नियम’ दाखवून माझ्या वरळी मतदारसंघातील कोळीवाड्यातील उत्सवांवर निर्बंध आणले जात आहेत.”
मराठी सणांवरच बंधनं का?
आपल्या पोस्टमध्ये पुढे ते म्हणाले, “या सरकारला मराठी माणसांच्या सणांविषयी इतका आकस का आहे? ‘चुनावी हिंदुत्व राबवायचं आणि सत्तेत आल्यावर मात्र मराठी सणांवर बंधनं घालायची’ – ही कसली नीति?”
फडणवीसांनी काय म्हटले होते?
भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत मशिदींवरील लाऊडस्पीकरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्या म्हणाल्या, “लाऊडस्पीकरमुळे होणारे ध्वनीप्रदूषण धोकादायक आहे. मशिदींमध्ये मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर वाजवले जातात, त्यामुळे नागरिकांना त्रास होतो.”
यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “केंद्र सरकार आणि न्यायालयाच्या आदेशानुसार प्रार्थनास्थळांवरील लाऊडस्पीकरसाठी ठरवलेल्या नियमांचे पालन करावे लागेल. उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. रात्री १० ते सकाळी ६ दरम्यान लाऊडस्पीकरचा वापर करता येणार नाही. परवानगी असलेल्या वेळेतही आवाजाची मर्यादा सकाळी ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबल इतकी असेल.”