
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लंडनमध्ये एका महत्त्वाच्या मुलाखतीत काश्मीर प्रश्नावर मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “पाकव्याप्त काश्मीर (PoK) हा भारताचाच भाग असून तो परत मिळण्याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत. हा भाग भारतात परत आल्यास जम्मू-काश्मीरमध्ये कायमस्वरूपी शांतता निर्माण होईल.”
लंडनमधील थिंक टँक ‘चॅथम हाऊस’ येथे ‘भारताचा उदय व जागतिक भूमिका’ या विषयावर बोलताना त्यांनी काश्मीर प्रश्नावर भारताची स्पष्ट भूमिका मांडली. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत कोणती रणनीती अवलंबत आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी सांगितले की, शांतता प्रस्थापनेसाठी भारत तीन टप्प्यांमध्ये काम करत आहे.
तीन टप्प्यांची प्रक्रिया
जयशंकर यांनी सांगितले की, “शांतता निर्माण करण्यासाठी पहिला टप्पा होता कलम ३७० हटवणे. हा टप्पा आम्ही पूर्ण केला आहे. दुसऱ्या टप्प्यात काश्मीरच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे – आर्थिक सुधारणा, रोजगार निर्मिती आणि सामाजिक न्यायाची अंमलबजावणी सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यात काश्मीरमध्ये लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदानाचे प्रमाण वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमुळे हा टप्पाही पार पडत आहे.”
“आता पाकव्याप्त काश्मीरची वेळ”
जयशंकर पुढे म्हणाले, “आम्ही कलम ३७० हटवलं, निवडणुका घेतल्या आणि आता पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा सोडवायची वेळ आली आहे. पाकिस्तानकडून बळकावण्यात आलेला हा भाग परत मिळवणं हेच काश्मीरच्या दिर्घकालीन स्थैर्यासाठी आवश्यक आहे. तो भाग भारतात परत आल्यानंतर सर्व समस्या सुटतील.”
अमेरिकेच्या धोरणांचा भारताला लाभ?
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांबाबत विचारले असता जयशंकर म्हणाले, “अमेरिका बहुध्रुवीयतेच्या दिशेने वाटचाल करत असून हे धोरण भारताच्या हिताचं आहे. दोन्ही देश द्विपक्षीय व्यापार कराराच्या आवश्यकतेवर सहमत आहेत आणि यामुळे भारत-अमेरिका संबंध आणखी बळकट होतील.”
जयशंकर यांच्या या वक्तव्यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणात मोठे संकेत मिळाले असून, पाकव्याप्त काश्मीरबाबत भारताची भूमिका अधिक ठाम होत असल्याचं स्पष्ट होत आहे.