
घाटकोपरचा मुरली नाईक वीरमरण पावला; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केली श्रद्धांजली
9 मे रोजी पहाटे 3 वाजता भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर हल्ले केल्यानंतर पाकिस्तानने बिचकून सीमारेषेवर गोळीबार सुरू केला. भारतीय सैन्य दलाने याला सडेतोड प्रत्युत्तर देत पाकिस्तानी रेंजर्सना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र, या संघर्षात देशाचे दोन वीरसैनिक शहीद झाले आहेत.
शहीद झालेल्यांमध्ये घाटकोपर, मुंबई येथील मुरली श्रीराम नाईक यांचा समावेश आहे. मूळचे आंध्र प्रदेशातील सत्यसाई जिल्ह्यातील गोरंटला तालुक्यातील रहिवासी असलेले नाईक सध्या मुंबईच्या कामराज नगर झोपडपट्टीत राहत होते. मात्र काही दिवसांपूर्वी पुनर्विकासाच्या प्रक्रियेमुळे त्यांचे घर हटवण्यात आले असून, कुटुंब सध्या आंध्र प्रदेशात राहते आहे.
मुरली नाईक यांच्या वीरमरणाची बातमी समजताच घाटकोपर परिसरात शोककळा पसरली. वार्ड क्रमांक 133 मध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारे बॅनर्स लावण्यात आले असून स्थानिक नागरिकांनी त्यांच्या शौर्याला सलाम केला आहे.
या झटापटीत पूँछ सेक्टरमध्ये दुसरे जवान दिनेश शर्मा देखील पाकिस्तानशी लढताना शहीद झाले आहेत. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
शहीद मुरली नाईक यांना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ट्विटरवरून श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी म्हटले की, “देशासाठी बलिदान देणाऱ्या मुरली नाईक यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या सहवेदना आहेत.”
दरम्यान, पीडीपीच्या अध्यक्षा महबुबा मुफ्ती यांनी देखील भारत-पाकिस्तान संघर्षावर प्रतिक्रिया देताना भावूक होत म्हटलं की, “सीमावर्ती भागातील लोक दररोज संघर्ष करत आहेत. आता हे युद्ध थांबले पाहिजे. आपल्या मातांना अजून किती यातना सहन कराव्या लागणार?”
सध्या सीमेवरील तणाव कायम असून भारतीय सैन्य पाकिस्तानच्या कारवायांना चोख प्रत्युत्तर देत आहे. देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीर जवानांना संपूर्ण भारत कृतज्ञतेने नमन करत आहे.