
नवी दिल्ली | 9 मे 2025:
भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. पाकिस्तानने 8 आणि 9 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नियंत्रण रेषेजवळ आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर मोठ्या प्रमाणावर ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागले. मात्र भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या अत्याधुनिक प्रत्युत्तरामुळे पाकड्यांचा हा डाव पुन्हा एकदा अपयशी ठरला. भारतीय एअर डिफेन्स सिस्टिमच्या मदतीने 50 हून अधिक ड्रोन हवेतच उडवण्यात आले. एवढंच नव्हे तर पाकिस्तानचे तीन फायटर जेट्स – दोन JF-17 आणि एक F-16 – भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करताना पाडण्यात आले.
हल्ल्यांची मालिका आणि लष्कराचे काऊंटर ड्रोन ऑपरेशन
पाकिस्तानी सैन्याने जम्मू, सांबा, अखनूर, नगरोटा, उधमपूर आणि पठाणकोट या संवेदनशील क्षेत्रांमध्ये ड्रोन पाठवले. हे ड्रोन भारतात घुसून गुप्त माहिती मिळवण्याचा, तसेच क्षुल्लक स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न करत होते. भारतीय लष्कराने त्वरित ‘काऊंटर ड्रोन ऑपरेशन’ सुरू केले आणि बहुतेक सर्व ड्रोन सीमेलगतच उध्वस्त केले. भारतीय हवाई दलाने काही क्षेपणास्त्रांनाही लक्ष्य करून हवेतच निष्क्रिय केले.
व्हिडीओ सोशल मीडियावर; आकाशात धूराचे लोट
भारतीय लष्कराने या कारवाईचे काही थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ड्रोन आणि क्षेपणास्त्र हवेतच नष्ट होतानाचे दृश्य स्पष्टपणे दिसत आहेत. अनेक भागांमध्ये आकाशात धूराचे लोट पाहायला मिळाले, ज्यामुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र लष्कराने तात्काळ परिस्थिती नियंत्रणात घेतली.
OPERATION SINDOOR
Pakistan Armed Forces launched multiple attacks using drones and other munitions along entire Western Border on the intervening night of 08 and 09 May 2025. Pak troops also resorted to numerous cease fire violations (CFVs) along the Line of Control in Jammu and… pic.twitter.com/WTdg1ahIZp
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) May 9, 2025
‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पाकिस्तानची बेचैनी
या कारवाईचा केंद्रबिंदू ठरले ‘ऑपरेशन सिंदूर’. भारतीय लष्कराने याआधी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून अनेक दहशतवादी तळ नेस्तनाबूत केले होते. यामुळे पाकिस्तान लष्कर आणि सरकार दोघेही अडचणीत आले असून त्यांनी भारताविरोधात नव्या कुरापती सुरु केल्या आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताने केलेल्या कारवाईवर आक्षेप घेत, त्याचा अपप्रचार केला होता.
शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि भारताची सडेतोड भूमिका
पाकिस्तानने गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. जम्मू आणि काश्मीरच्या सीमेवर गोळीबार आणि ड्रोनहल्ले होत आहेत. मात्र प्रत्येक वेळी भारताने अधिक ठाम आणि परिणामकारक उत्तर दिले आहे. भारतीय लष्कराचे प्रवक्ते म्हणाले, “भारतीय सेना देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. पाकिस्तानकडून कोणतीही आगळीक सहन केली जाणार नाही.”
S-400 आणि भारतीय तंत्रज्ञानाची ताकद
या सर्व हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना भारताच्या S-400 एअर डिफेन्स सिस्टिमने महत्वाची भूमिका बजावली. पंजाबच्या भटिंडा येथे पहाटे ४ वाजता पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्यात आला होता. हे ड्रोन S-400 प्रणालीद्वारे काही सेकंदांत हवेतच उडवण्यात आले.
जागतिक प्रतिक्रिया आणि तणावाची पार्श्वभूमी
भारताच्या या ठोस कारवाईनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. संयुक्त राष्ट्रसंघ आणि अमेरिका यांच्याकडून संयम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र भारताने स्पष्टपणे सांगितले आहे की, आपली सीमा, सुरक्षा आणि नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही कृतीला कधीही क्षमा केले जाणार नाही.