
नवी दिल्ली | प्रतिनिधी भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे. या ऑपरेशनअंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या लाहोर शहराजवळील अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाची एअर डिफेन्स सिस्टीम – HQ-9 पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे. ही माहिती भारतीय लष्कराने अधिकृत प्रेस नोटद्वारे जाहीर केली असून, आता लाहोरच्या सुरक्षेसमोरील हवाई कवचच नष्ट झालं आहे.
पाकिस्तानने चीनकडून मागवलेली HQ-9 ही अत्याधुनिक Surface-to-Air Missile प्रणाली लाहोरच्या संरक्षणासाठी तैनात केली होती. ही यंत्रणा एकाच वेळी 100 टार्गेट्स ट्रॅक करून त्यांचा नाश करण्यास सक्षम होती. मात्र भारताच्या अचूक आणि धडक कारवाईने ती पूर्णपणे निष्प्रभ करण्यात आली आहे. यामुळे भारताला आता लाहोरपर्यंत हवाई कारवायांचं मोकळं रान मिळालं आहे.
HQ-9 प्रणाली ही चीनच्या CPMIEC या कंपनीने विकसित केली असून, ती जमिनीवरून हवेत मारा करणारी यंत्रणा आहे. पाकिस्तानने 2021 मध्ये ही यंत्रणा आपल्या हवाई ताफ्यात समाविष्ट केली होती. भारताचे राफेल, सुखोई आणि ब्राह्मोस क्षेपणास्त्र यांसारख्या हवाई धोक्यांचा सामना करण्यासाठी ही यंत्रणा तैनात करण्यात आली होती.
दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर संतप्त झालेल्या पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय लष्कराच्या S-400 एअर डिफेन्स सिस्टीमने हा हल्ला अपयशी ठरवला. भारताच्या “सुदर्शन चक्र” युनिटने सुसज्ज S-400 प्रणालीद्वारे पाकिस्तानकडून आलेली सर्व क्षेपणास्त्रं आणि ड्रोन आकाशातच नष्ट केले.
या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, इस्लामाबाद, लाहोर, रावळपिंडी आणि कराचीसारख्या शहरांमध्ये सतत सायरन वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जात आहे.
भारतीय लष्कराची ही कारवाई ही केवळ सामरिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर तांत्रिक श्रेष्ठतेचंही प्रतीक मानली जात आहे. HQ-9 सिस्टीमचा नाश आणि पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांचा यशस्वी प्रतिकार यामुळे भारताच्या हवाई ताकदीला अधिक बळकटी मिळाली आहे.