
भारत-पाकिस्तानदरम्यान सध्या निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरातील राज्यांना मॉक ड्रील घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार ७ मे २०२५ रोजी महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये ही मॉक ड्रील राबवली जाणार आहे. यामध्ये शत्रू देशाच्या संभाव्य हल्ल्याच्या स्थितीत नागरिकांचे संरक्षण, स्थलांतर आणि आपत्कालीन प्रतिसाद याचा सराव केला जाईल.
मॉक ड्रील म्हणजे काय आणि का?
मॉक ड्रील म्हणजे संकटांची रंगीत तालीम. युद्धजन्य परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती किंवा दहशतवादी हल्ला अशा प्रसंगी नागरी प्रशासन, पोलीस, सिव्हिल डिफेन्स, आरोग्य विभाग यांना कसोटीला उतरावं लागतं. अशा प्रसंगात नागरिकांना कशाप्रकारे सुरक्षित राहता येईल, याचं प्रशिक्षण देण्यासाठी मॉक ड्रीलचं आयोजन केलं जातं.
गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, ही ड्रील सायरन अलर्ट, स्थलांतर प्रक्रिया, बचाव कार्य, प्राथमिक वैद्यकीय मदत या घटकांवर आधारित असेल.
महाराष्ट्रातील कोणकोणत्या शहरात होणार मॉक ड्रील?
मुंबई, ठाणे, उरण, तारापूर, पुणे, नाशिक, मनमाड, सिन्नर, पिंपरी-चिंचवड
औरंगाबाद, भुसावळ, रोहा-नागोठणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
यातील काही ठिकाणी – जसे की नाशिक, मनमाड आणि सिन्नर – विशेष प्रात्यक्षिकेही आयोजित करण्यात येणार आहेत.
सायरन वाजल्यावर काय कराल?
घाबरू नका. ही ड्रील आहे, खरी आपत्ती नाही.
सायरन वाजल्यानंतर ५-१० मिनिटात सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करा.
मोकळ्या जागांपासून दूर रहा; घरात किंवा सुरक्षित इमारतीच्या आत जा.
सरकारी सूचना, टीव्ही-रेडिओ, मोबाईल अलर्ट्स याकडे लक्ष ठेवा.
अफवांवर विश्वास ठेवू नका; अधिकृत घोषणाच ऐका.
इतरांना देखील योग्य माहिती द्या आणि मदतीसाठी तयार राहा.
सायरन कुठे-कुठे वाजतील?
जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस मुख्यालय
फायर स्टेशन, सरकारी इमारती
मोठ्या बाजारपेठा आणि गर्दीची ठिकाणं
काही सैन्याच्या जवळच्या परिसरात
कोणकोण सहभागी होणार?
या मॉक ड्रीलमध्ये खालील यंत्रणा सहभागी होणार आहेत:
जिल्हाधिकारी व प्रशासन अधिकारी
पोलीस, होम गार्ड, सिव्हिल डिफेन्स वॉर्डन
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी
NCC (नॅशनल कॅडेट कोअर)
NSS (नॅशनल सर्व्हिस स्कीम)
NYKS (नेहरू युवा केंद्र)
राज्य सरकार हायअलर्टवर, प्रशासन सज्ज
मुंबईतील डीजी ऑफिसमध्ये महत्त्वाची बैठक घेण्यात आली असून, त्यात सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन विभाग, नागरी सुरक्षा दलाचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीला संचालक सतीश खडके यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केलं. राज्यभरातील सर्व महापालिकांचे आयुक्त व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या चर्चेत सहभागी झाले.
प्रभात कुमार, संचालक – नागरी सुरक्षा दल यांनी स्पष्ट केलं आहे की, “ही ड्रील पूर्णतः नियोजित आहे. नागरिकांनी घाबरू नये. आम्ही सर्व यंत्रणांना तयार ठेवले आहे. ड्रीलच्या वेळी नागरिकांनी फक्त प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं.”
नागरिकांसाठी आवाहन:
या मॉक ड्रीलमुळे कोणीही गोंधळून किंवा घाबरून जाऊ नये. ही आपली आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठीचा एक महत्त्वपूर्ण सराव आहे. सतर्क राहा, पण शांत राहा.