
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानसोबतचा ऐतिहासिक सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या या निर्णायक पावलामुळे पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ माजली आहे. त्यांच्या नेत्यांकडून एकामागून एक आक्रमक, विरोधाभासी आणि हास्यास्पद वक्तव्ये केली जात आहेत.
कधी भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली जातेय, तर कधी थेट युद्धासाठी ललकारलं जात आहे. मात्र या सगळ्या गोंधळावर पाकिस्तानचे माजी राजदूत अब्दुल बासित यांनी आपल्या देशाच्या मंत्र्यांना चांगलंच खडे बोल सुनावले आहेत.
मिसाइल्स भारतासाठी ठेवली आहेत – रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांचा वादग्रस्त दावा
पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांनी एका पत्रकार परिषदेत भारताला थेट धमकी दिली.
“आम्ही आमच्या मिसाइल्स चौकात सजवायला ठेवलेली नाहीत, त्या भारतासाठी आहेत,” असे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “भारताकडून जर कोणतेही पाऊल उचलले गेले, तर पाकिस्तान युद्धासाठी तयार आहे.” अशा प्रकारची बेजबाबदार भाषा, तीही रेल्वे सारख्या खात्याचा मंत्री करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गृहमंत्री मोहसिन नकवींची थेट युद्धाची भाषा
फक्त रेल्वे मंत्रीच नव्हे, तर गृह मंत्री मोहसिन नकवी यांनीही युद्धाची भाषा केली. “भारताने कुठलाही अविचारी निर्णय घेतल्यास, पाकिस्तान लगेच प्रत्युत्तर देईल,” अशी धमकी त्यांनी दिली.
पाकिस्तानमध्ये नेत्यांच्या अशा वायफळ वक्तव्यांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची खिल्ली उडवली जात आहे.
माजी राजदूत अब्दुल बासित यांची खरमरीत टीका: “किमान भारताकडून शिका!”
या सर्व घटनांवर प्रतिक्रिया देताना माजी पाकिस्तानी राजदूत अब्दुल बासित यांनी अत्यंत परखड शब्दांत आपल्या देशाच्या नेत्यांना सुनावलं.
त्यांनी म्हटलं, “पहलगामच्या घटनेनंतर पाकिस्तानात प्रत्येकजण ‘चौधरी’ बनलाय. कोणीही मनमानी पत्रकार परिषद घेत आहे. जास्त नाही, तरी किमान आपल्या शत्रूकडून — भारताकडून — काही शिका! तिथे कोणीही प्रसारमाध्यमांसाठी स्पर्धा करत नाही. ते एकसंघ राहून उद्दिष्ट्य गाठण्याचा प्रयत्न करतात.”
अब्दुल बासित यांनी हेही सांगितले की, “हा फार गंभीर विषय आहे. भारताकडून कधीही कठोर कारवाई होऊ शकते. त्यामुळे सावध आणि शिस्तबद्ध वर्तन आवश्यक आहे. मनात आलं की कोणीही पत्रकार परिषद घेणं हा हास्यास्पद प्रकार आहे.”
“खाजणे, केस ठीक करणे… बॉडी लँग्वेज लाजिरवाणी”
अब्दुल बासित यांनी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या वागणुकीवरही सडकून टीका केली.
“स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत संरक्षण मंत्र्यांची बॉडी लँग्वेज गंभीरतेच्या अगदी विरोधात होती. कधी ते केस सावरत होते, कधी चाळाचाळ करत होते. त्यांच्या वर्तनाने पाकिस्तानची जागतिक प्रतिमा आणखी खराब झाली,” असे ते म्हणाले.
“रेल्वे मंत्र्याला पत्रकार परिषद घ्यायची परवानगी कोणी दिली?”
अब्दुल बासित यांनी रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांच्यावरही खरमरीत सवाल उचलले.
“रेल्वे मंत्र्याचा अशा संवेदनशील विषयाशी काय संबंध? कोणाच्या परवानगीने त्यांनी पत्रकार परिषद घेतली? जर पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी त्यांना परवानगी दिली असेल, तर या संकटकाळात सरकारने परिस्थिती हाताळण्याचे भान ठेवले आहे का, याचा विचार करायला हवा,” असे बासित यांनी जोरदार टोला लगावला.
गोंधळलेल्या पाकिस्तानची नामुष्की
पहलगामच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने शांतपणे, परंतु ठाम भूमिका घेतली आहे, तर पाकिस्तान मात्र आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर स्वतःचीच खिल्ली उडवत आहे. असंघटित, गोंधळलेली आणि जबाबदारीपासून दूर पळणारी नेतेमंडळी यामुळे पाकिस्तानची अवस्था अधिकच बिकट होत चालली आहे.