
भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण चिघळलेले असतानाच आज पाकिस्तानवर आणखी एक मोठे संकट कोसळले आहे. लाहोरमधील अल्लामा इकबाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत विमानतळावर एकच अफरातफर उडाली असून, अनेक विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे.
आग लागली कशी?
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याचे एक विमान सकाळी अंदाजे 10 वाजता लाहोर विमानतळावर उतरत होते. उतरत असताना अचानक विमानाच्या टायरला भीषण आग लागली. काही क्षणांतच धुराचे प्रचंड लोट संपूर्ण रनवेवर पसरले. प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि विमानतळावर एकच गडबड उडाली.
आग लागल्यानंतर घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. जवानांनी अथक प्रयत्न करून काही तासांत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
विमानतळावरील हालचाली ठप्प
या घटनेनंतर लाहोर विमानतळावरून सर्व उड्डाणे तात्पुरती थांबवण्यात आली आहेत. तसेच जे विमान लाहोरमध्ये उतरण्याच्या तयारीत होते, त्यांचे मार्ग बदलून त्यांना इतर विमानतळांकडे वळवण्यात आले आहे. विमान प्रशासनाने रनवे काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, उड्डाणे पुन्हा कधी सुरू होतील याबाबत अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.
यामुळे हजारो प्रवासी विमानतळावर ताटकळत बसले आहेत. अनेक प्रवाशांना आपल्या पुढच्या प्रवासाच्या नियोजनात अडचणी येत आहेत.
चौकशीला सुरुवात
विमानाच्या टायरला आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार, तांत्रिक बिघाड किंवा देखभाल व्यवस्थेतील निष्काळजीपणा यामुळे ही दुर्घटना घडली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली असून, लवकरच याबाबत अधिकृत अहवाल सादर केला जाणार आहे.
आधीच संकटात असलेला पाकिस्तान
याच वेळी पाकिस्तानमध्ये इतरही अनेक आंतरिक समस्या उफाळून आल्या आहेत. बलूचिस्तान लिबरेशन आर्मीने आज सकाळी पाकिस्तानी सैन्यावर भीषण हल्ला केला, ज्यात पाकिस्तानचे 10 सैनिक ठार झाले आहेत. त्यामुळे पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
दुसरीकडे, भारताने सिंधू जल करार स्थगित करण्याची घोषणा केल्यानंतर पाकिस्तानने घाबरत मित्र राष्ट्रांकडे मध्यस्थीची याचना केली होती. मात्र, बहुतेक मित्र राष्ट्रांनी मदतीपासून दूर राहण्याची भूमिका घेतल्याने पाकिस्तान अधिकच अडचणीत सापडला आहे.
भारताशी तणाव वाढतोय
पुलवामानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक भूमिका घेतली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. त्यामुळे भारतीय विमानांना वळसा घालून जावे लागत आहे. मात्र, यामुळे पाकिस्तानलाच कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पाकिस्तान सध्या देशांतर्गत अशांतता, आंतरराष्ट्रीय एकाकीकरण आणि आर्थिक संकट यांच्या दुहेरी कचाट्यात अडकलेला आहे. त्यातच लाहोर विमानतळावरील भीषण आगीची घटना, म्हणजे दुष्काळात तेरावा महिना ठरली आहे. येत्या काही दिवसांत पाकिस्तान या संकटांवर कसा उपाय काढतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.