
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे एक मोठे आणि चिंताजनक षड्यंत्र समोर आले आहे. या हल्ल्याची रूपरेषा पाकिस्तानव्याप्त काश्मीर (POK) मध्ये अगोदरच आखण्यात आली होती. विशेष म्हणजे या कटात इस्लामी कट्टरपंथी गट हमास, लष्कर-ए-तय्यबा आणि जैश-ए-मोहम्मद एकत्र आले होते.
हल्ल्याआधी अवघ्या काही दिवसांपूर्वी ५ फेब्रुवारी २०२५ रोजी रावलकोट येथील शहीद साबिर स्टेडियममध्ये “काश्मीर एकता दिन” या नावाने एक मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने दहशतवादी सहभागी झाले होते. यामध्ये लष्कर आणि जैशचे टॉप कमांडर्स, भारतासाठी मोस्ट वॉन्टेड असलेले आतंकवादी, तसेच पहिल्यांदाच हमास संघटनेचे वरिष्ठ प्रतिनिधी सहभागी झाले होते.
हमासचा पहिला POKमधील प्रवेश – अल अक्सा ऑपरेशनचे महिमामंडन
या कार्यक्रमात हमासच्या उपस्थितीने सर्वत्र खळबळ उडवली. इराणमधील (तेहरान) हमासचा प्रमुख प्रतिनिधी डॉ. खालिद कददूमी स्वतः या कार्यक्रमात सहभागी होता. त्याच्यासोबत इतर पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनाही व्यासपीठ दिले गेले. “अल अक्सा फ्लड ऑपरेशन” या इस्रायलविरोधी मोहिमेचे भारतविरोधी जिहादमध्ये रूपांतर करून ते सादर करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमात भारताविरुद्ध खुलेआम विष पसरवले गेले आणि काश्मीरमध्ये जिहाद पेटवण्याचे आवाहन करण्यात आले.
लष्कर-जैशचे टॉप चेहरे हजर – हाफिजचा मुलगा, मसूदचा भाऊ आणि इतर कमांडर्स सक्रिय
या व्यासपीठावर लष्कर-ए-तय्यबाचा संस्थापक हाफिज सईद याचा मुलगा प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होता. त्याचबरोबर जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याचा भाऊ तल्हा सैफ, जैशचा लॉन्चिंग कमांडर असगर खान काश्मिरी, आणि मसूद इलयासी या सारखे कुख्यात कमांडर्सही या कटात सामील होते.
या सर्वांनी भारतविरोधी भडकावू भाषणं करत काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतवाद भडकवण्याचे संदेश दिले. त्यांच्या भाषणातून स्पष्टपणे दिसले की, या मेळाव्याचा उद्देश दहशतवादी शक्तींना एकत्र आणून भारताविरोधात एक ‘कॉमन फ्रंट’ तयार करणे हा होता.
“काश्मीरला बनवा गाझा” – जिहादी युतीचा उद्देश स्पष्ट
कार्यक्रमात हमास, लष्कर आणि जैश यांच्यात समन्वय घडवून काढण्याचा प्रयत्न दिसून आला. काश्मीरची तुलना गाझा पट्ट्याशी करण्यात आली आणि त्याला ‘पुढील जिहादी रणभूमी’ घोषित करण्याचा प्रयत्न झाला. ‘काश्मीरला गाझा बनवा’ अशी उघड चिथावणी देण्यात आली. हे वक्तव्य केवळ भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठीच नव्हे तर आंतरराष्ट्रीय शांततेसाठीही मोठा धोका आहे.
भारताविरुद्ध नव्या दहशतवादी युतीचा जन्म
या सर्व घडामोडींवरून स्पष्ट दिसते की भारताविरुद्ध एक नवा ‘दहशतवादी आघाडी’ उभी राहत आहे – ज्यात पॅलेस्टिनी कट्टरपंथी संघटना आणि पाकस्थित दहशतवादी गट एकत्र आले आहेत. हे केवळ एका हल्ल्याचे षड्यंत्र नाही, तर काश्मीरला आंतरराष्ट्रीय इस्लामी जिहादचा भाग बनवण्याचा कट आहे.
भारताने या प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. केवळ सीमा सुरक्षा नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ही दहशतवादी युती निष्प्रभ करण्यासाठी धोरणात्मक पावले उचलणे अत्यावश्यक ठरत आहे