
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन भागात मंगळवारी दुपारी झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा मृत्यू झाला असून, विविध जिल्ह्यांतून आलेले अनेक पर्यटक सध्या काश्मीरमध्ये अडकले आहेत. या भीषण घटनेने देशभरात खळबळ उडाली असून, प्रशासनाने संपूर्ण काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे.
या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर थेट गोळीबार केला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, धर्म विचारून लक्ष्य करण्यात आले. काही भारतीयांबरोबरच विदेशी नागरिकांनाही जीव गमवावा लागला आहे.
महाराष्ट्रातील मृत्यू आणि बचाव
या हल्ल्यात पुणे (२), डोंबिवली (३) आणि नवी मुंबई (१) येथील नागरिकांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती आहे. तर, अनेक पर्यटक थोडक्यात बचावले असून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
अमरावतीचे पर्यटक थोडक्यात बचावले
मंगला बोडके, छाया देशमुख, निता उमेकर, चंदा लांडे व सारिका चौधरी या पाच कुटुंबांमधील एकूण ११ पर्यटक हल्ल्याच्या वेळी बैसरनमध्येच होते. गोळीबार होण्याच्या काही क्षणांपूर्वीच ते तिथून निघाले होते. सध्या हे सर्वजण श्रीनगरमधील हॉटेल डेव्हलिप लँडमध्ये सुरक्षित आहेत.
देवयानी ठाकरे चाळीसगावच्या १४ पर्यटकांसह अडकल्या
भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष देवयानी ठाकरे या आपल्या कुटुंबीयांसह १४ जणांसोबत काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेल्या होत्या. हल्ल्याच्या वेळी त्या श्रीनगरमध्ये होत्या. सध्या त्या सर्वजण सुरक्षित असून २५ एप्रिल रोजी महाराष्ट्रात परतणार असल्याचे कुटुंबियांनी सांगितले. खासदार स्मिता वाघ आणि आमदार मंगेश चव्हाण हे सातत्याने संपर्कात आहेत.
नेहा वाघुळदे (जळगाव) थोडक्यात बचावल्या
जळगावच्या शिव कॉलनीतील नेहा वाघुळदे या मैत्रिणींसोबत काश्मीर दौऱ्यावर होत्या. हल्ल्याच्या वेळी त्या पहलगाम परिसरातच पर्यटन करत होत्या. लॉजवर परत आल्यावर काही क्षणातच हल्ला घडला. सध्या त्या सुरक्षित आहेत आणि २८ एप्रिलला परतणार आहेत.
बुलढाण्यातील जैन परिवार हॉटेलमध्येच
बुलढाण्याच्या अरुण जैन यांचे भाऊ, पत्नी व मुले पहलगाममधील एका हॉटेलमध्ये थांबलेले होते. गोळीबार सुरू होताच हॉटेल मालकाने त्यांना बाहेर पडू न सांगितले आणि त्यामुळेच त्यांचा जीव वाचला. सध्या ते सर्वजण हॉटेलमध्येच सुरक्षित आहेत.
राष्ट्रवादीचे प्रा. सुरेश बिराजदार घटनास्थळीच
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार हे आपल्या फॅमिलीसोबत हल्ला घडलेल्या भागापासून केवळ २ किमी अंतरावर होते. त्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, “दहशतवाद्यांना देश कधीही माफ करणार नाही,” असे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याशी थेट संवाद साधला.
परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष
सध्या काश्मीरमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. पर्यटकांना शक्य तितक्या लवकर त्यांच्या मूळ गावी परत पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लष्कर, CRPF आणि स्थानिक पोलिस घटनास्थळी तैनात आहेत.