
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असताना, शहरातील जमिनींच्या घोटाळ्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या मालिकेत आता आणखी एक प्रकरण भरलं आहे. भाजप नेते आणि मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट ‘लँड स्कॅमचे बादशहा’ असा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.
भाजप कार्यशाळेतून टीकेचा भडिमार
गरवारे क्लब येथे भाजपने आयोजित केलेल्या कार्यशाळेत वक्फ विधेयकावर चर्चा करताना शेलारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, “मुंबईत गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता होती. या काळात मुंबईतील महागड्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचं काम उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झालं.”
“आज मुंबईत एका स्क्वेअर फूटची किंमत १ लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. अशा अमूल्य जमिनी कोणाच्या परवानगीशिवाय बिल्डरकडे जाऊ शकतात का?” असा सवाल करत शेलारांनी ठाकरे गटालाच जबाबदार धरलं.
भाजपवर केलेल्या आरोपांना उत्तर
उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच भाजपवर आरोप केला होता की, “हे लोक जमिनी घेऊन थेट अंबानी-अदाणींना देतात.” या आरोपाला प्रत्युत्तर देताना शेलार म्हणाले, “उद्धव ठाकरे आम्हाला सवाल करत आहेत, पण बिल्डरांना जमीन देण्याचं पाप त्यांनीच केलं आहे. कोणतीही जमीन बिल्डरकडे जाणार नाही, हे मी आताच स्पष्टपणे सांगतो.”
राजकीय रणनीतीचा भाग?
मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच पक्षांची रणनीती सुरू आहे. या निवडणुकीत केवळ मुंबईच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाचंही लक्ष लागलेलं आहे. त्यामुळेच, या लँड स्कॅमच्या आरोपांना केवळ राजकीय आरोप म्हणून पाहायचं की त्यामागे ठोस मुद्दे आहेत, हे पाहणं महत्वाचं ठरेल.
उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया काय असेल?
शेलारांनी उद्धव ठाकरे यांना थेट ‘लँड माफिया’ संबोधल्यामुळे आता ठाकरे गटाकडून यावर काय प्रतिक्रिया येते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. त्यांच्या पक्षाकडून स्पष्टीकरण येतं का, की नव्या आरोपांची मालिका सुरू होते, याकडे राज्याचं आणि मुंबईकरांचं लक्ष लागलेलं आहे.