
महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर अनेक राजकीय घडामोडी सुरू असताना, अलीकडेच एका पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे-ठाकरे गट युतीबाबत विचारलेल्या प्रश्नावर चिडून “कामाचं बोला!” असं उत्तर दिलं. त्यांच्या या विधानावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार आणि नेते राजू पाटील यांनी थेट प्रत्युत्तर देत ‘कामांची यादी’च त्यांच्यासमोर ठेवली आहे.
राजू पाटील यांनी एकनाथ शिंदेंच्या विधानाचा उद्धृत करत ट्विटरवर एक सडेतोड पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी शिंदेंना थेट प्रश्न विचारले आहेत आणि पालकमंत्री व नगरविकासमंत्री या नात्याने उत्तर देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
राजू पाटील म्हणाले काय?
“जे कामाचे नाहीत, ते श्री प्रभू रामाचे पण नाहीत……!
परवा आमचे पालकमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांनी मनसे-शिवसेना (उबाठा) युतीबाबत विचारलेल्या एका प्रश्नावर पत्रकाराला चिडून बोलले की, ‘कामाचं बोला!’ मग मीही काही कामाचे प्रश्न त्यांना विचारतोय. किमान नगरविकास मंत्री आणि आमचे पालकमंत्री म्हणून तरी उत्तर अपेक्षित आहे,” असं म्हणत त्यांनी पुढील प्रश्न विचारले :
जे कामाचे नाहीत, ते श्री प्रभू रामाचे पण नाहीत……!
परवा आमचे पालकमंत्री श्री.एकनाथजी शिंदे मनसे-शिवसेना (उबाठा) युतीबाबत विचारलेल्या एका प्रश्नासंदर्भात संबंधित पत्रकाराला चिडून बोलले की कामाचे बोला ! चला तर मी पण काही कामाचे प्रश्न त्यांना विचारतोच. किमान नगरविकास मंत्री व… pic.twitter.com/ftfUBXR29k
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) April 21, 2025
विचारलेले प्रश्न हे स्थानिक विकासकामांवर लक्ष केंद्रित करणारे:
पलावा पुल व लोकग्राम पुल – या दोन्ही पुलांचे काम किती वर्षांपासून प्रलंबित आहे, तरी ते कधी पूर्ण होणार?
दिवा रेल्वे ओव्हरब्रिज (ROB) – या प्रकल्पाचे काम कधी सुरू होणार, आणि वाहतूक कोंडीतून दिवा परिसराला कधी दिलासा मिळणार?
कल्याण-तळोजा मेट्रोचे भूसंपादन – बिल्डरांच्या फायद्यासाठी हा प्रकल्प सुरू केला गेला का? जर भूसंपादन न झालं, तर वाहतुकीला त्रास देणारे हे काम थांबवणार का?
कल्याण-शीळ रस्त्यावरचे शेतकरी आणि तिसरी लाईन – रस्त्यामुळे प्रभावित शेतकऱ्यांना मोबदला कधी? आणि तिसरी लाईन कधी सुरू होणार?
पलावा जंक्शनवरील अनधिकृत बांधकामे – या ठिकाणच्या अनधिकृत बांधकामांमुळे वाहतूक अडथळलेली आहे. ती हटवून दुसऱ्या पुलाचे काम कधी सुरू होणार?
अमृत योजना – २७ गावांसाठी असलेली ही पाणीपुरवठा योजना कधी पूर्ण होणार?
१४० एलएलडी पाण्याचा कोटा – नवी मुंबईला देण्यात आलेला कल्याण-डोंबिवलीकरांचा पाण्याचा हक्क कधी परत मिळणार?
दिवा डंपिंग ग्राउंड – अनधिकृतपणे सुरू असलेलं हे डंपिंग कधी बंद होणार?
नवीन घेतलेल्या १४ गावांचा विकास निधी – या गावांसाठी आवश्यक असलेले ५९०० कोटी रुपयांचे पॅकेज कधी मंजूर होणार?
अनधिकृत बांधकामे – मानपाडा रोड व कल्याण-शीळ मार्गावरील अनधिकृत बांधकामे कधी हटवली जातील?
राजकीय पातळीवर हल्लाबोल
राजू पाटलांचा हा ट्विट म्हणजे एका प्रकारे शिंदेंच्या कार्यक्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा हल्ला मानला जात आहे. ‘कामाचं बोला’ म्हणणाऱ्या शिंदेंनाच कामांवरून जाब विचारल्यामुळे हा राजकीय शाब्दिक सामना चांगलाच गाजतो आहे.
दरम्यान, या आरोपांवर आणि प्रश्नांवर एकनाथ शिंदे यांच्याकडून अजून कोणतंही उत्तर मिळालेलं नाही. मात्र, या मुद्द्यांवर पुढील काही दिवसांत राजकीय वातावरण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.