भारत सरकारने “मेक इन इंडिया” अंतर्गत सुरू केलेल्या वंदे भारत एक्सप्रेस प्रकल्पाने देशातील प्रवासी रेल्वे क्षेत्रात क्रांती घडवण्याचे स्वप्न दाखवले. अत्याधुनिक तंत्रज्ञान, उच्च वेग, आणि आरामदायी सुविधा यामुळे ही ट्रेन भारतीय रेल्वेचा चेहरा बनली. मात्र, प्रत्यक्षात या प्रकल्पाचा प्रचंड खर्च आणि गाडीचा सरासरी वेग पाहता प्रवाशांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे.
सरकारने वंदे भारत प्रकल्पासाठी सुमारे 110 कोटी रुपये प्रति ट्रेन इतका प्रचंड खर्च केला आहे. या खर्चात अत्याधुनिक डिझाइन, इन-हाऊस उत्पादन, आणि आरामदायी प्रवासासाठी असलेल्या सुविधांचा समावेश आहे. सध्या वंदे भारत एक्सप्रेसच्या 25 पेक्षा जास्त गाड्या देशभरात चालू असून, भविष्यात यांची संख्या शेकड्यांमध्ये पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे.
उच्च तिकीट दर – वेळेची बचत कुठे?
वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दरांवर नजर टाकल्यास, सामान्य प्रवाशांच्या दृष्टीने ही गाडी “हाय-स्पीड लक्झरी”च्या श्रेणीत येते. उदाहरणार्थ, मुंबई-सोलापूर मार्गावरील चेअर कारचे तिकीट सुमारे ₹ 965 ते ₹ 2,000 पर्यंत आहे, जे सामान्य एक्सप्रेस गाड्यांच्या तुलनेत तीनपट जास्त आहे.
प्रवासी हे पैसे वेळ आणि सुविधा यासाठी मोजतात. परंतु, ज्या गाडीचा ताशी 160 किमीचा वेग अपेक्षित आहे, तीच गाडी 500 किमी अंतरासाठी 6-7 तास घेते, जे एका सामान्य एक्सप्रेस ट्रेनच्या वेळेइतकेच आहे. म्हणजेच, जिथे प्रवाशांना चार तासांत पोहोचण्याची अपेक्षा होती, तिथे वेळेची बचत होताना दिसत नाही.
वंदे भारत ट्रेन सुरू करताना जलद प्रवासाचा गाजावाजा करण्यात आला होता. मात्र, भारतातील रेल्वे ट्रॅकची सद्यस्थिती ही ट्रेनच्या वेगासाठी मोठा अडथळा ठरते. जुने आणि वळणदार मार्ग, अपूर्ण पायाभूत सुविधा, तसेच मालवाहतूक व्यवस्थापन या सर्वांमुळे वंदे भारत ट्रेनला अपेक्षित वेग गाठता येत नाही.
याशिवाय, गाड्यांना मध्यवर्ती स्थानकांवर अनावश्यक थांबे, क्रॉसिंगवरील प्रतीक्षा, तसेच ट्रॅकवरील मालगाड्यांचे ओझे यामुळे वेळेचा अपव्यय होतो. त्यामुळेच वंदे भारत एक्सप्रेसचा वेग 80-100 किमी प्रतितास इतकाच राहतो, जो सामान्य सुपरफास्ट गाड्यांच्या वेगासारखा आहे.
वंदे भारत ट्रेनला अपेक्षित यश मिळवून देण्यासाठी रेल्वे ट्रॅक अपग्रेडेशन, सिग्नल यंत्रणेचे आधुनिकीकरण, मालवाहतूक व्यवस्थापन सुधारणा, आणि सुरक्षा यंत्रणा मजबूत करणे आवश्यक आहे.
प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी वंदे भारत ट्रेनचा तिकीट दर जास्त ठेवणे समजू शकते, पण वेळेत पोहोचण्यात होणारा अपयश हा प्रकल्पाच्या उद्दिष्टांवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवण्याआधी वंदे भारतच्या कार्यक्षमतेवर अधिक लक्ष दिल्यास देशातील जलदगती रेल्वेचा विकास अधिक प्रभावी ठरू शकतो.
जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव